पन्हाळा : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१७-१८ साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला.
संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. विशाल पाटील यांनी मनोगतातून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचा आढावा घेतला.
प्राचार्य डॉ. मुळगुंद यांनी बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे (बाटू) महत्त्व विशद केले; तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. सहसचिव एन. आर. भोसले यांनी ‘साठ आणि चाळीस मार्क हा ‘बाटू’चा बेस असला, तरी विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून फर्स्ट क्लास मिळवला पाहिजे, तरच विद्यार्थी नोकरीच्या स्पर्धेत टिकू शकेल,’ असे सांगितले. चेअरमन पी. आर. भोसले यांनी ‘संजीवन’मधील माजी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात संजीवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि संगीत शिक्षक श्री. गुरव यांच्या स्वागतगीतांनी झाली. कार्यक्रमादरम्यान अनेक पालकांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी पालक प्रतिनिधी सुरेश पाटील, संस्थेचे सहसचिव एन. आर. भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. मुळगुंद, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. डॉ. विशाल पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
एम. सी. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. नसरीन खान यांनी आभार मानले.